Thursday, June 30, 2022

देवता विसर्जन विधी:


विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध,अक्षता (गंधाक्षता कुंकू मिश्रित तांदूळ), हळदी -कुंकू वाहून पूजा करावी.
दहीभाताचा नैवेद्य दाखवावा व क्षमाप्रार्थना म्हणावी, हातात अक्षता घेऊन खालील मंत्र त्या देवतांवर वहाव्यात नंतर एका  पांढऱ्या कापडात मुठभर तांदूळ, एक सुपारी, सुट्टी नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबरच नैवेद्याचा दही भात ठेवावा व कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जित प्रवाहात विसर्जित करावे
"यांतु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवा । इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च ॥"
(वरिल मंत्रातील देव या शब्दाचे ठिकाणी विसर्जन करावयाच्या पूजा केलेल्या देवतेचे नाव घ्यावे. )

 टीप: 
१.  काचेचा फोटो असेल फक्त कागदाच्या फोटोचे विसर्जन करावे, काच किंवा फ्रेम प्रवाहात सोडू नये, जेणेकरून कुणास इजा किंवा पर्यावरणास धोका होणार नाही

संदर्भ ग्रंथ: मराठी संस्कृती मराठी अस्मिता

#आद्य_शंकराचार्यांचे श्लोक

 #आद्य_शंकराचार्यांचे हे श्लोक अतिशय अर्थपूर्ण व जीवनविषयक बहुमोल मार्गदर्शन करणारे आहेत..

            कुणी एक रक्षक नगराच्या गल्लीबोळातून रात्रीच्या वेळी राखण करण्यासाठी हिंडत असताना "सावधान","जागे रहा"असं ओरडत व मार्गातील भूमीवर आपल्या हातातील दंड आपटीत चालत जात असे.
            एका रात्री त्याला परगावी काही कामानिमित्त जायचं होतं म्हणून त्याच्या मुलानं ते काम हाती घेतलं.त्या मुलाला दैववशात् आपल्या पूर्वजन्मातील स्मृति..ज्ञान असल्यानं तो मार्गानं जाताना हे खाली दिलेले श्लोक मोठ्या आवाजात म्हणत जात असे ज्यामधे वारंवार जागे रहा.. सावध व्हा.. असे शब्द येत होते.
           दुसर्‍या दिवशी सकाळीच तिथला राजा राखणदाराची वाट पहात त्याच्या दाराशी उभा असलेला त्यानं पाहिला..आणि आपल्या मुलानं काहीतरी कर्तव्यात कुचराई केली असं वाटून भीतीनं थरथरायला लागला.आता त्या कुचराईचं फळ संपूर्ण परिवाराला भोगावं लागणार आणि राजाच्या रागाला सामोरं जावं लागणार या विचारांनी तो अस्वस्थ झाला..
            पण तसं तर घडलं नाहीच उलट त्या राजानं बहुमूल्य भेटवस्तु देऊन त्या परिवाराला सन्मानितही केलं व त्या मुलाचं खूप कौतुकही केलं..त्याची खूप प्रशंसा केली.इतकंच नाही तर त्या मुलाची खूप मोठ्या वेतनावर आपल्या राजप्रासादाच्या रक्षणार्थ नेमणूकही केली..
          त्या मुलानं म्हटलेले ते मूळचे आचार्यविरचित श्लोक आणि त्यांचा यथामति पद्यबद्ध मराठीतला स्वैर भावानुवाद खालील प्रमाणे...

१.
माता नास्ति पिता नास्ति नास्ति बन्धुः सहोदरः।
अर्थं नास्ति गृहं नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥

कुणी कुणाची नसते माता नसतो पिता कुणीही
भाऊ सख्खा जुळा चुलत वा नसे कुणास कुणीही
द्रव्य नसे वा घरहि कुणाचे ठसवा निजमनि नित्य
व्हा जागे व्हा जागे सावध जाणुनि अबाध्य सत्य

२.
जन्म दुःखं जरा दुःखं जाया दुःखं पुनः पुनः।
संसारसागरे दुःखं तस्मात् जाग्रत जाग्रत॥

दुःख जन्मता जन्मे,जन्मे वार्धक्यामधि दुःख
पहिली दुसरी असो कोणती पत्नी देई दुःख
अपार दुस्तर संसाराचा सागर भरला दुःखे
म्हणून जागा सावध राही दूर राखण्या दुःखे

३.
कामः क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठन्ति तस्कराः।
ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जाग्रत जाग्रत।।

चोरायास्तव ज्ञानरूप हे तुज जवळी जे रत्न
कामक्रोधलोभांच्या रूपे चोर करिति नित यत्न
नरदेही ते तिघेहि लपती शोधिति अचूक संधी
जागा राही टाक काढुनी देउ नको त्या अवधी

४.
आशया बध्यते जन्तुः कर्मणा बहुचिन्तया।
आयुः क्षीणं न जानाति तस्मात् जाग्रत जाग्रत।।

आशांनी करकचून राही जीव बंधनी विषयांच्या
सकाम कर्मे विषयचिंतने चिंतांनी सुखदुःखांच्या
नकळत जीवन सरते घटते क्षणाकणाने आयुष्य
नकोस दवडू पळही राही जागा ठरवी निजलक्ष्य

५.
सम्पदः स्वप्नसंकाशाः यौवनं कुसुमोपमम्।
विद्युच्चंचलमायुष्यं तस्मात् जाग्रत जाग्रत॥

वैभव लक्ष्मी धन संपत्ती स्वप्नासमची मिथ्या
कोमल पुष्पासम तारुण्यहि टाकी क्षणात काया
क्षणभंगुर आयुष्य विजेसम म्हणून सावध राही
जागा होई सत्वर मनुजा झोप हितावह नाही

६.
क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं जीवितमावयोः।
यमस्य करूणा नास्ति तस्मात् जाग्रत जाग्रत॥

क्षणजीवी धन,मनही चंचल,जीवन तवमम तैसे
दावी करुणा दया न यम तो कठोर निष्ठुर बैसे
कणक्षण व्यर्थ नये बा दवडू साधावे हित अपुले
सावध होई जागा राही विषयांनी ना होइ भले

७.
यावत् कालं भवेत् कर्म तावत् तिष्ठन्ति जन्तवः।
तस्मिन् क्षीणे विनश्यन्ति तत्र का परिदेवना॥

जोवरि उरती कर्मभोग वा उरे जोवरी क्रियमाण
तोवरि केवळ जीव राहतो धरतीवर धरुनी प्राण
क्षणात ज्या ते भोग संपती,कर्तव्ये ना मुळि उरती
देह सोडुनी जीव जातसे क्षणीच त्या निजगृहाप्रती
कोण कशास्तव प्रलापशोका करी तयांच्या मागे
व्यर्थ निरर्थक ठरेच बघ ते कुणी कुणाचा नच लागे

                         - आ. श्री. श्रीपाद केळकर. (कल्याण)


पाप कुठे जात असते ??

  एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल.


पण गंगा तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल?

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली.

कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. 

देव त्या ऋषी समोर प्रकट झाला.

ऋषींनी देवाला विचारले " हे देवा सर्व लोक गंगे मध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते?"

भगवान म्हणाले की " चल आपण त्या गंगालाच विचारू."

ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"

गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते!"

आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता , गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"

समुद्र म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"

आता ते लोक ढगांकडे गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने वाफ बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "

ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात पीक येत. हे उपजलेले पीक, अन्न म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या मानसिकतेने माणसाकडून खाल्या जाते , त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "

कदाचित म्हणूनच म्हणतात  जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन

म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात.

या करिता अन्न नेहमीच देवाचे नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे. आणि जे धान्य खरेदी करणार ते पैसे प्रामाणिकपणे कमावलेले आणि परीश्रमाचे असले पाहिजेत!

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.

            🙏 || शिव शरणार्थ ||  🙏

जन्म, उपनयन, विवाह, निधन इत्यादी महत्वाच्या संस्कारांत मृत्तिकापात्र (मडके) वापरण्यामागे हेतू कोणता ?

     जन्माच्या वेळी नाळ पुरण्यासाठी, उपनयनाचे वेळी मंडपदेवता मांडताना, विवाहाचे वेळी मंडपदेवता, गौरीहराची पूजा करताना व निधनाचे वेळी अग्नी नेताना मृत्तिकापात्र वापरले जाते. अर्थात निरनिराळ्या प्रसंगी त्यास मडके, वरूण, संक्रांत, मृत्तिकापात्र, गाडगे अशा विविध संज्ञा आहेत.


     जन्म, विवाह, मरण या घटना भावनिक दृष्टिकोनातून  आनंदशोकादि विकार निर्माण करणाऱ्या असल्यामुळे त्यांची भिन्नता असली तरी, शास्त्रदृष्ट्या त्या घटना म्हणजे अवस्थांतरे होत. ही अवस्थांतरे एकाच केंद्रीभूत वस्तूच्या बाबतीत घडतात, आणि ती केंद्रीय वस्तू म्हणजे मानवी देह होय.

     ज्याप्रमाणे अनंत आकाश एखाद्या घटात सामावले म्हणजे त्याला घटाकाश म्हणतात (घट ही उपाधी होय) त्याप्रमाणे अनंत ब्रम्ह मायेच्या उपाधीमुळे मानवी देहात सामावते. मानवी देहाचे महत्त्व घटाइतकेच आहे. आत्म्याचा निवास संपताच मानवी देहाच्या या घटाची अगदी अल्पकाळातच विल्हेवाट लावतात. येथे मानवी देहाला प्राप्त होणारे महत्त्व केवळ आत्मप्रवेशामुळे असते. या गोष्टीची तीव्र जाणीव रहावी, या उदात्तीकरण हेतूने जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक वेळी या ना त्या नीमित्ताने मृत्तिकापात्र (मडके) समोर ठेवले जाते.

     हल्ली वरूणाची पूजा तांब्याच्या कलशावर करतात. पण खरे पहाता रंगीत घटावर वरूण पूजणे हे केव्हाही संयुक्तिक आहे. जर मानवी देहाची नश्वरता सातत्याने नजरेसमोर राहिली नाही, तर त्या देहाचे अनाठायी लाड करून देहपूजा करण्यातच अख्खा जन्म संपून जातो. ज्यासाठी देहप्राप्ती झाली, ती विविध ऋणे फेडून ईश्वराची कास धरण्याचा मुख्य उद्देश सतत डोळ्यासमोर रहावा, देहाची नश्वरता व आत्म्याची अमरता चित्तावर ठसावी, या उद्देशाने शास्त्राने प्रत्येक संस्कारात येनकेनप्रकारेण मृत्तिकापात्राचा समावेश केला आहे.

संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.

देवतीर्थ

मंदिरातील गाभाऱ्यात असणाऱ्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध, दही, वेलचीपूड, कापूर, केसर, लवंग तेल, तूप, साखर, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो, तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो.


हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो.

चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी, ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे.

ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा भक्तांना वाटते की, मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “दीपाराधना“ केली जाते, किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभाऱ्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात, तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात.

-
---------------------------------------------
🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
---------------------------------------------

उदकशांती।

 उदकशांती। म्हणजे काय ती केव्हा व का करतात. ......

उदकशांती बद्दल लोकांना फार माहिती नसते.
ती का करावी ?कधी करावी ? कोणी करावी ? इत्यादी बरेच प्रश्न लोकांना पडतात किंवा माहितीच नसल्याने त्यांच्या कडून हा महत्वाचा विधी राहून जातो.
उदकशांती म्हणजे पाण्याची केलेली शांती.
आपण एखाद्या अंत यात्रेत सहभागी झालो तर घरी येऊन लगेच अंघोळ करतो. आपला देह लगेच शुद्ध करतो. पण जर घरातच अशी घटना घडली तर काय काय शुद्ध करणार आपण आणि कसे ?
आपण ज्या जागेत राहतो त्या जागेची शुद्धी करणे म्हणजे उदकशांती करणे.
🌹उदा.
आपण रोज अंघोळ करतो.
रोज दात घसतो.
कपडे धुतो.
अंथरून पांघरूण नित्य नियमाने धुतो.
रोज लादी पुसतो.
पण ज्या घरात राहतो त्या घराची शुद्धी करत नाही कधीच
का?
कारण...
माहिती नसते, टाळाटाळ करतो, दुर्लक्ष करतो किंवा होते.
वापरून वापरून घराची ऊर्जा रोज खर्च होऊन होऊन संपलेली असते. मग ती वास्तू तुम्हाला लाभ दायक ठरत नाही. त्याचे परिणाम हळू हळू गंभीर जाणवायला लागतात.
अशी कित्येक उदाहरणे आहेत माझ्या समोर.
वास्तूशांती केली तरीपण त्रास होतोय असा प्रश्न घेऊन येतात लोक.
किती वर्षे झाली वास्तूशांती करून ?
उत्तर असते 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे इत्यादी.....
एकदा जेवल्यावर पुन्हा महिनाभर जेवायला नको असे होते का कुठे ?
जसा मोबाईल ला चार्जर लागतो,
जसे देहाला अन्न लागते,
तसच वास्तूला सुद्धा जमलेला मळ काढून शुद्ध करावे लागते वेळो वेळी.
साध्या पाण्यात कार्बन सोडून त्याचा सोडा बनतो,
साध्या पाण्यात काही टाकले की सरबत बनते,
सध्या पाण्यातूनच फिनाईल बनते..
तसेच साध्या पाण्याला मंत्रांनी प्रभावित करून ते पाणी घरात शिंपडावे, म्हणजे उदकशांती
ही शांती फक्त घरात कोणी मृत झाल्यावरच नाही ..
तर प्रत्येकाने आपल्या घरी नियमित दर तीन वर्षांनी करायला हवी
काहिजण भाड्याची जागा घेतात, मग ती राहण्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो, ती शुद्ध न करता वापरली तर कित्येक वेळा त्याचे परिणाम भयानक समोर येतात. किती तरी उदाहरणे आहेत समोर ज्यांना भाड्याच्या घरात किंवा दुकानात खूप वेगवेगळा त्रास सहन करावा लागला आहे.
आजारी पडणे, अपघात होणे, मृत्यू होणे, घरात बाधा असल्याचे अनुभवाला येणे इत्यादी खूप त्रास समोर आले आहेत.
त्यामुळे भाड्याने जागा घेतल्यावर केवळ गणपती पूजन न करता उदकशांती करावी
काहीजण म्हणतात आमच्याकडे सत्यनारायण पूजा दर वर्षी होते.
उत्तम आहे.
पण मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमोल ह्यातील जो फरक आहे तोच सत्य नारायण पूजा आणि कोणत्याही शांतीत आहे.
पूजा आपले पुण्य संचित वाढवते आणि शांती दोष दूर करते.
त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने ह्याचा विचार करावा.
उदक शांतीसाठी तिथी व दिवस महत्वाचा तिथी तृतीया एकादशी द्वादशी पौर्णिमा वार बुधवार शुक्रवार रविवार बुधवार सर्वात उत्तम...

🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

0000



I खंडोबाची तळी कशी भराय़ची ?? II

१. कुलस्वामी खंडोबा असणार्‍या कुटुंबात अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी अन् काही कुटुंबांत विजयादशमी

(दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी ‘तळी भंडार’ हा विधी केला जात असणे
‘ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात, त्या प्रत्येक कुटुंबात ‘तळी भंडार’ हमखास होतोच. ‘तळी भंडार’ हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर ‘तळी भंडार’ करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबांत विजयादशमी (दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो.

 

२. विधी का केला जातो
‘मणिसुर आणि मल्लासुर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषिमुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच ‘तळी भंडार’ हे प्रतीक आहे’, असे प्रचलित आहे.

 

३. ‘तळी भंडार’ विधी
३ अ. जेजुरी मंदिरात केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी
१. जेजुरी मंदिरात भंडारगृह, बारद्वारी किंवा पितळी कासव यांवर ‘तळी भंडार’ विधी केला जातो. घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यांत थोडा भेद आहे. देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो.

२. खोबर्‍याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो. खोबर्‍याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे ‘या माध्यमातून आपला वंश खोबर्‍याच्या तुकड्यांसारखा (कुटक्यासारखा) एकास दोन आणि दोनास चार’, असा वाढो’, ही सदिच्छा व्यक्त केली जाते. दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडार्‍यासह उधळल्या जात असत. कालौघात मोहरा उधळणे शक्य नाही; म्हणून खोबरे उधळले जाते. सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा आहे. अंतःकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोचते.

३ आ. घरी देवासमोर केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी
एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्‍याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात.एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्‍याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात. त्यानंतर पानाचा विडा ठेवून (काही कुटुंबांत डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र भूमीवर ठेवून) त्यावर ताम्हन ठेवले जाते. एक विडा देवासमोर ठेवतात. तळी उचलणार्‍या प्रत्येक व्यक्तीपुुढे एकेक विडा ठेवतात. देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात. शेवटी तळीचे ताम्हन मस्तकी लावतात.

 

४. ‘तळी भंडार’ विधी
स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे ।
त्यामाजी अष्टदळ काढावे ।
भंडारे पूरित करावे । मध्ये कलश स्थापिजे ॥ १ ॥

नागवेली दळे करून ।
कलश सुशोभित करावा जाण ।
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून ।
तळीकेचे पूजन करावे ॥ २ ॥

मुष्टीभंडार आत ठेवावा ।
आप्त-परकीय समुदाय मेळवावा ।
येळकोट नामाचा उच्चार करावा ।
एकावच्छेदे करूनिया ॥ ३ ॥

तळी उचलून आधार पात्रावर ठेविजे ।
मग भंडारा सर्वांस लाविजे ।
प्रसाद सर्वांस वाटिजे । अत्यादरे करूनिया ॥ ४ ॥

तळी भरावयाचे समयी । दीपिका करी असावी ।
मग तळी पुन्हा उचलावी ।
मस्तकी धारण कीजे ॥ ५ ॥

५. येळकोट येळकोट जयमल्हार ।
हर हर महादेव । चिंतामणी मोरया ।
आनंदीचा उदे उदे । भैरोबाचा चांगभले ।
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ॥ १ ॥

अगडधूम नगारा । सोन्याची जेजुरी ।
देव आले जेजुरा ।
निळा घोडा । पायात तोडा । कमरी करगोटा ।
बेंबी हिरा । मस्तकी तुरा ॥ २ ॥

अंगावर शाल । सदाही लाल ।
आरती करी । म्हाळसा सुंदरी ।
देवा ओवाळी नानापरी ॥ ३ ॥

खोबर्‍याचा कुटका । भंडाराचा भडका ।
अडकेल ते भडकेल । भडकेल तो भंडार ।
बोल बोल हजारी । वाघ्या मुरुळी ।
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम ॥ ४ ॥

बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ।
येळकोट येळकोट जयमल्हार ।’



000000



  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...