नवगणराजूरी, बीड
संकलन - सुधीर लिमये पेण
बीड जिल्ह्यातील राजुरीचे नाव नवगण गणपतीसाठी ओळखले जाते. राजुरी नवगण हे गणेशाचे स्थान बीडशहरापासून अहमदनगर रस्त्यावर दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या पंचक्रोशीत नवगण म्हणजेच नऊ गणपतीची स्थाने आहेत. त्यामुळे या गणपतीस नवगण व गावास नवगण राजुरी या नावाने मराठवाड्यात ओळखले जाते.
या गणपती मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे चार दिशेला चार गणेश मूर्ती एकाच ठिकाणी एका दगडावर पाहायला मिळतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशेला चार गणपतीची रुपे एकाच शिळेवर एकत्र आहेत. पूर्वेकडे मुख असलेला ‘महामंगल’, पश्चिमाभिमुख ‘शेषाब्धिष्ठित’, दक्षिणाभिमुख ‘मयूरेश्वर’ आणि उत्तराभिमुख ‘उतीष्ट’ हे चार गणपती. या मूर्ती वेगवेगळ्या आसनात अंदाजे पावणेचार फूट उंचीच्या आहेत. हे मंदिर पेशवेकालीन असून मंदिरात पाच व गावाच्या चार वेशींवर चार गणपती आहेत. त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी म्हणतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. या पद्धतीने एकाच ठिकाणी गणेशाची चार रुपे एकाच दगडात साकारलेले गणेशस्थान भारतात दुसरीकडे नाही. या चार दिशेच्या गणेशाचे दर्शन चारी दिशेने घेता येते. पाचवी मूर्ती गाभाऱ्यात आहे.
महाराष्ट्रात श्रीगणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत. परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या गावात नऊ गणेशाचे अधिष्ठान असल्यामुळे नवगण असे नामाभिधान या गावाला मिळाले.
ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणांची स्थापना केली आहे. त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीता शोध सुरु केला होता. आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत. राजुरी गावाच्या परिसरात ऋषी-मुनींचे आश्रम होते. पश्चिमेला बाल्व ऋषींचा आश्रम होता म्हणूनच या डोंगरी भागाला बालाघाट असेही म्हटले जाते.
पूर्वेकडील महामंगलेश्वर प्राचीन काळापासुन राजूरी हे ९ गणेशाचे पीठ असुन अनादी सिद्ध स्थान आहे. अनेक ऋषी-मुनींच्या पदस्पर्शाने व प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या तपोबलाने ही भुमी सिद्ध झालेली असल्यामुळे या भुमीची पवित्र व पावनभुमी म्हणुन ओळख आहे. पुर्वी हा भुप्रदेश दंडकारण्य म्हणुन ओळखला जात असे. येथे दंडक नावाचा राजा राज्य करत होता. विरळ वस्ती असलेल्या अरण्याचा हा प्रदेश राजा दंडक या नावाने ओळखला जात असे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्वत: तप करण्यासाठी भगवान विष्णुकडून ही भुमी मागुन घेतली. ती आज राजुरी ग्रामक्षेत्र होय. या भुमीत ब्रह्मदेवाने कठोर तप केले.
दक्षिणेचा मयूरेश्वर सत्ययुगात त्रिपुरासुर शंकराच्या वराने उन्मत झाला होता. (तिन्ही पुरावर ज्याची सत्ता तो त्रिपुर) तिन्ही लोकांत त्याची सत्ता होती. त्याने सर्व देव जर्जर केले. तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, विष्णु, इंद्रदेवांनी त्याच्यासोबत युद्ध केले. तेव्हा देवाचा पराजय झाला. देवांचे सर्व शस्त्र निष्फळ झाले. झालेल्या पराजयावर विचार-मंथन झाले तेव्हा शंकराच्या लक्षात आले की, आपण गणेश पुजन केले नाही म्हणुन पराजय व दु:ख वाट्याला आले. भगवान शंकराने रांजन गावी गणेशाची स्थापना केली. ब्रह्मदेवांनी राजुरी क्षेत्री तप केले व सर्व देवासह यज्ञ करुन गणेश स्थापना केली.
पश्चिमेचा शेषाब्दिधष्ठीत ब्रह्मदेवांनी यज्ञ आरंभी आग्रपुजेसाठी वेदोच्चारामध्ये गणेशाची स्थापना केली. तो निर्विघ्नेश्वर होय. ती मुर्ती मंदिरात विराजमान आहे. तिला उत्सवमुर्तीही संबोधले जाते.
उत्तरेकडील उतिष्ठ गणेश यज्ञ समारंभ सुरु असताना आसुरी (राक्षसी) शक्तीचा त्रास होऊ लागला, यज्ञात विघ्ने येऊ लागली. तेव्हा त्याच भुमीवर एकाच चौकणी शिळेवर ४ गणेशाची स्थापना केली. त्यांची चारही बाजुला अवलोकन दृष्टी असावी म्हणुन चारही दिशेला ४ गणेशाची स्थापना केली. पुर्वेकडील महामंगलेश्वर, पश्चिमेचा शेषाब्दिध्ष्ठीत, दक्षिणेचा मयुरेश्वर, उत्तरेकडील उतिष्ठ गणेश अशा एकुण ५ गणेशाची स्थापना केली. त्यांची आसने व वाहने निरनिराळी आहेत. ४ गणेशमुर्ती ४ वेदाचे रुप व ब्रम्हदेव स्वरुप मानल्या जातात. म्हणुनच गणेश उपासनेवेळी ब्रह्मनसूक्त म्हटले जाते. त्यानंतर ४ सीमेवर ४ गणेशाची स्थापना केली. शिरापुरचा श्री वरद, तिप्पटवाडीचा त्रिपुरनंदन, लिंबारुईचा संगमेश्वर व राजाबाई टेकडीवरील चिंतामणी अशा नवगणेशाची स्थापना प्रत्यक्ष ब्रम्हदेवानी केली.
आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका स्थापित आहेत. त्रेतायुगामध्ये रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा प्रभू श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधात दंडकारण्यात आले असताना अगस्ती ऋषी आणि श्रीरामाची भेट झाली. ऋषींनी श्रीरामाचे स्वागत केले तेव्हा श्रीरामाने (सीताहरण)ची व्यथा अगस्तींना सांगितली. तेव्हा ऋषींनी प्रभू श्रीरामाला सांगितले की, येथून तीन योजने दूर (बाराकोस) गणेशाचे सिद्ध स्थान आहे. त्याचे दर्शन झाल्यावर विजय प्राप्त होतो आणि सर्व दुःख दूर होतात. पुढे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि अगस्ती ऋषी राजुरीला आले आणि गणेशपूजन करून सीतेच्या शोधात पुढे गेले. आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका स्थापित आहेत.
------+-----
No comments:
Post a Comment