Saturday, December 24, 2022

स्वप्न*'Dream it, Belive it, do it'.

 *स्वप्न*

'Dream it, Belive it, do it'. या तीन शब्दांनी माझं आयुष्य बदलुन गेलयं. 'स्वप्न बघा, त्यावर विश्वास ठेवा आणि ती प्रत्यक्ष कृतीत आणा' असा त्याचा अर्थ. स्वप्नांशिवाय कुणाच्याही जीवनाला अर्थ नाही. प्रत्येकाने स्वप्न ही बघीतलीच पाहिजेत, मात्र ती जागेपणी. डोळे उघडे ठेऊन. आपण पाहिलेल्या स्वप्नावर आपली दृढ निष्ठा पाहिजे. विश्वास पाहिजे. आपलं अंत:करणापासून त्यावर प्रेम पाहीजे आणि ती प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी, पुर्ण करण्यासाठी सतत कार्यरत झालं पाहिजे. तरच आपल्याला यश मिळतं.
       जी व्यक्ती सतत नवनवीन कल्पनांमध्ये मनापासून रमते ती व्यक्ती तिच्या मनात असलेली कल्पना एक दिवस खरी करुन दाखवतेच. जे लोक आपली स्वप्न उराशी बाळगुन ते साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात त्यांना यश निश्चित मिळते. कोलंबस हा दुसऱ्या जगाची कल्पना उराशी कवटाळून होता. एक दिवस त्याने शोध लावलाच. बुद्धाने आत्मीक शांती आणि ताणतणाव नसलेल्या सुंदर जगाची कल्पना केली व ती प्रत्यक्ष साकार करुन दाखवली. कोपरनीकसननेही मोठ्या जगाची कल्पना प्रत्यक्षात उतरवुन दाखवली. अशी अनेक उदाहरणे शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्याची देता येतील. त्यांनी स्वप्न कशी पाहिली आणि ती प्रत्यक्षात कशी साकार केली याचा अभ्यास केल्यास आपल्यालाही आपली स्वप्न साकार करणे कठीण जाणार नाही. आपण कुठलीही इच्छा व्यक्त करताना ती प्राप्त करण्यासाठीच करावी. मात्र ती इच्छा तत्काळ पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. धीर धरुन प्रयत्न केल्यानंतरच आपले इच्छापुर्ती होते हे लक्षात असू द्या.
        आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी युवांना संदेश देताना आपल्या भाषणामध्ये, 'छोटी स्वप्न बघणे हा गुन्हा आहे' असे सांगितले होते. ते सर्वार्थाने खरे आहे. स्वप्न पाहायची तर ती मोठी. भव्य-दिव्य आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नही करायचे ते ‌ शर्थीचे. यश नक्कीच मिळेल. मात्र स्वप्न पाहिले आणि अर्ध्यावरच प्रयत्न सोडले, तर हाती खूप मोठी निराशा येते. म्हणूनच सर्वात प्रथम स्वप्न असे पहा की कठोर परिश्रम करायला लागले तरी चालतील, पण साध्य होईल. आपली स्वप्न ही झोपल्यानंतर पडणारी वा वास्तवात न येणारी नसावीत. तर ती जागेपणी पाहिलेली असावीत. डोकं शांत ठेऊन, पूर्ण विचार करुन पाहिलेलं स्वप्न हे नेहमीच खरं ठरतं. ज्यांनी अशी स्वप्न पाहिली तेच पुढे गेले. मोठे झाले. दिवा स्वप्न पाहून काहीही उपयोग होत नसतो. असा माणूस फक्त कल्पनेत रमतो. वास्तवामध्ये मात्र त्याच्या पदरी मोठी निराशा येते.
       आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला मिळालेल्या आयुष्यात आपण काही करुन दाखवलं नाही तर आपल्या जगण्याला काहीही किंमत उरत नाही. जिवंतपणी आपल्याला कुणी विचारत नाही आणि मृत्यूनंतर आपलं नावही कुणी काढत नाही. आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या जगण्याचा आपल्या जन्मदात्या आई-वडीलांनाही उपयोग होत नाही की कुटूंबियांना आणि स्वतःलाही. म्हणूनच जे काही आयुष्य आपल्या हातात आहे. त्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने स्वप्न पहायला शिकलं पाहीजे. स्वप्न पाहताना आपण त्यांचं नियोजन व्यवस्थितपणे आखलं पाहिजे. डोळ्यासमोर आपल्या स्वप्नाशिवाय इतर काहीही न दिसता स्वप्नाकडेच आपली वाटचाल सुरु राहिली पाहिजे. ते पूर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. तरच ती पूर्ण होतात. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वप्न सर्वच पाहतात. मात्र पुर्ण त्यांचीच होतात जे जिद्दीने पूर्ण झोकून देऊन त्यादृष्टीने वाटचाल करतात.
       स्वप्ने ही आपल्या जीवनाला महत्त्वाचे वळण प्राप्त करुन देतात. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरतात. चांगली स्वप्न आपलं जीवन आनंदी करण्याची प्रेरणा देतात. जीवन कसं जगावं ? हे शिकवतात. मात्र फक्त स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करणे हे बऱ्याचवेळा हानीकारक ठरते. त्यामुळे जीवनात निराशा येते व आपण वाहत जातो. जीवनाची दिशाच बदलून जाते. म्हणूनच स्वप्न निश्चित करतानाच ते पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निश्चय केला पाहिजे. या निश्चयाच्या बळावरच आपण आपली स्वप्न पूर्ण करु शकतो. त्यासाठी कालावधी मोजला जाता कामा नये. एवढी वर्ष झाली तरी मला यश मिळत नाही ? माझे स्वप्न पूर्ण का होत नाही ? असे प्रश्न पडण्यापेक्षा माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी काय केलं पाहीजे ? स्वप्नपूर्तीसाठी मी कोणता योग्य मार्ग निवडायला हवा ? त्यासाठी कोणत्या चुका निस्तरायला हव्यात ? यादृष्टीने गांभीर्याने वेळोवेळी विचार केला पाहिजे. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्यक्ष जगातील सर्व गोष्टी विसरुन अदृश्य जगतामध्ये, इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगायला शिकलं पाहिजे. या जगण्यात खूप मोठा आनंद मिळतो. या विश्वात रमणारी व्यक्ती एक दिवस आपल्या भावविश्वातील कल्पना खऱ्या करुन दाखवते. आपली स्वप्न आपल्या उराशी कवटाळून ती साकारण्यासाठी तहानभुक विसरुन प्रयत्न करतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वप्नपुर्तीचे यश मिळतेच मिळते.
     स्वप्न पाहणाऱ्यांनी धीर धरायला हवा. एका दिवसात सर्व काही मिळत नाही. कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होत नाही. त्यासाठी काही कालावधी जावाच लागतो. वाट पहावीच लागते. स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत अनेक अडथळे येतात त्यांच्यावर मात करुन खंबीरमनाने न थकता, न दमता आपण आपली वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. मनामध्ये शुद्ध विचार ठेऊन अंत:करणापासून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणारे यशस्वी होतातच. आपण आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे. नकारार्थी विचारांना मनामध्ये कधीही थारा देता कामा नये. जे चांगले विचार मनात उत्पन्न होतील ते साकारण्यासाठीच प्रयत्न करा. मनात आलेली सुंदर कल्पना पूर्ण करण्यासाठीच मनात आणा. कुठलीही इच्छा व्यक्त करताना ती मिळवण्याचाच प्रयत्न करा. असे वागणारेच यशस्वी झालेत. त्यांचीच स्वप्न पूर्ण झालीत. तुम्ही तुमचे विचार, कल्पना, इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागल्यानंतर आपल्या मनातील वाईट विचार आपोआप नष्ट व्हायला लागतात. तुम्ही तुमच्या स्वप्नाशी एकरुप झाल्याने इतर अनावश्यक गोष्टी करायला तुम्हाला वेळच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सहजपणे आपल्या स्वप्नांना कवेत घेता.
       स्वप्न पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 'सामान्य माणूस एका फळामध्ये किती बी आहे ते पाहत असतो तर स्वप्न उराशी बाळगणारा त्या फळातील एका बी मधून किती फळे निर्माण करता येतील, या दृष्टीने विचार करत असतो. कारण त्याला त्या बी मधील ताकत माहित असते. ते बी जमिनीत रुजवले, त्याला खतपाणी घातले, थोडी मेहनत घेतली तर त्याच बी चे मोठ्या वृक्षात रुपांतर होते व एका बी पासून वर्षानुवर्ष मिळणारी फळं आपल्याला मिळतात. स्वप्न पाहतानाही असाच विचार केला पाहिजे.'
       राइट बंधूंनी उडणाऱ्या पक्षास पाहून 'माणुसही उडू शकतो' असे स्वप्न पाहिले. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली आणि विमानाचा शोध लावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणीच स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि जीवाची बाजी लावून ते पूर्ण केले. जागेपणी पडणारी स्वप्न ही प्रत्यक्षात उतरतातच. म्हणूनच मोठे स्वप्न पहा आणि ती साकारण्यासाठी अथक परिश्रम करा. संयम, निष्ठा आणि आत्मविश्वासाच्या बळावर साकारलेल्या स्वप्नांची फुले आपल्या जीवनामध्ये सुगंध पसरवतील, तुमचे आयुष्य सत्कारणी लावतील आणि मान-सन्मान, पद, पैसा व प्रतिष्ठाही आपोआप आपल्याकडे चालून येईल लक्षात ठेवा,

• *शरद यशवंत पाटील*
   *संपादक, मशाल,*
   *वाडा, जि. पालघर*
  *• WP - 8600001111*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...