फक्त तुझ्या गंधाने
मम मोह अनावर होतो
रसनेचा लगाम सुटतो
मी सहज ओढला जातो।
पाहुन पिवळी तव कांती
मी अति भुकेला होतो
हातात यायच्या आधी
नजरेने खाऊन घेतो।
मग पाव पांघरूनी वरती
लसणीची चटणी भरूनी
तळल्या मिरचीच्या संगे
मी तुजला उचलून घेतो।
प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा
किती विरोध झाला तरीही
हे प्रेम न माझे घटते
आस्वाद तुझा मी घेतो।
हे बटाट्यावड्यांनो..!

======================================
काल रात्री वाडीतल्या माडाला वादळ येऊन भेटलं
भेटलं कसलं म्हणता नको तेवढं खेटलं...
शंभर माड झोपवेन असला वादळाचा होरा होता
दहा वादळ झेलीन असला माडाचाही तोरा होता
सोसाट्याच्या वार्यापुढे त्याचा फोक थोडा वाकला
पण छाती पुढे काढून माड पुन्हा उभा ठाकला
वारा त्याला कधी भेलकावत तर कधी वाकवत होता
माड फक्त स्वतः ला तेव्हा एवढंच ऐकवत होता
झेपलं नाही वादळ तर उद्या सागराला कसा चिडवेन
सोसला नाही वारा तर उद्या कल्पवृक्ष कसा म्हणवेन
उध्वस्ततेच्या खुणा ठेवून वादळ जेव्हा शमलं होतं
तेव्हा जेती झुंज देऊन माड पुरतं दमलं होतं
वादळ झेलून वाडीतला माड आज टेचात उभा
आहे
आभाळ कवेत घेण्याचा त्याचा पुढचा मनसुबा आहे
वादळ सोसल्या शिवाय मोठेपण मिळत नाही
माड असो किंवा माणूस असो वादळ कुणा टळत नाही
-प्रशांत जोशी , अंबरनाथ
No comments:
Post a Comment