Wednesday, July 27, 2022

देशील उत्तर..

 *थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन - देशील उत्तर..*

मी अमावस्येचा चंद्र
नेहमी कुठेतरी लपलेला
तु पौर्णिमेचं चांदणं,
लखलख प्रकाश खुललेला
तु आयुष्याचं रंगीत गाणं
अन सुरेल स्वरांची मैफिल
मी फक्त आसुसलेला श्रोता
स्तब्ध, निःशब्द अन सदा गाफील

तु गुलाब, तु रातराणी
तु फुलांची भरलेली ओंजळ
तु शांत भरलेला जलाशय अन
मी त्यात उमललेलं कमळ...

तु आठवणींचा शिडकाव,
रणरणत्या उन्हात
मी फुटलेला बांध
भावनांच्या पुरात

तु सौंदर्याला पडलेलं निरागस स्वप्न,
जागं झालं की ते विसरुन जायचं असतं,
तु पावसाची अवचित सर...
म्हणती, अरे वेड्या, असं घसरुन जायचं नसतं...
आठवतं, आपण भातुकलीचा डाव मांडला होता,
तु वाढताना माझ्यावर भात सांडला होता,
तेव्हा क्षुल्लक कारणावरुन मी खोटंखोटं घरच मोडलं होतं,
लुटीपुटीच्या खेळात आपलं खरं नातंच तोडलं होतं,
तु खोटेखोटे चित्र, अन त्यात मी माझ्या
कल्पनांचे जीवंत रंग भरलेले..
तु मृगजळ आणि भ्रम, हे माहीत असुन सुद्धा,
तुझे शिल्प मीच माझ्या मनावर कोरलेले...
तु अभिनय करतेस छान,
तुझ्या दोन भुमिका..
कोणती खरी तु?
पत्नी कि प्रेमिका?..


--------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – हाताखालच्या माणसांना कसं हाताळु?
---------------------------------------------------------------------------------------
मी एका कंपनीमध्ये सुपरव्हायझर आहे, माझ्या हाताखाली एक माणुस आहे कामाला, वयाने आणि एक्सपिरीअन्स ने माझ्यापेक्षा मोठा आहे,
पण म्हणुन की काय, पण तो मी सांगितलेले कुठलेच काम ऐकतच नाही,
आणि तेच काम जर साहेबांनी सांगितले तर तत्परतेने करतो,
साहेबांचं आणि त्यांचं खुप जमतं,
दोघे मिळुन मला त्रास पण देतात,
मार्गदर्शन करावे,
----------------------------------------------------------------------------------------------
ऑफीस असो वा फिल्डवर्क, नौकरी असो वा व्यवसाय,
अंगमेहनतीची काम करणारे लेबर्स असो किंवा घराघरात काम करणार्‍या कामवाल्या,
हाताखालची माणसं काम ऐकत नाहीत, ही तुम्ही सांगितलेली समस्या आजकाल सगळीकडे बघायला भेटते.
आजकाल शारिरीक श्रम कोणालाच नकोच वाटतात,
अगदी आपल्यालाही एका लेव्हल नंतर कितीही महत्वाचं असलं तरी काम करायचा कंटाळा येतोच,
आणि अशा आळशीपणाला ऑफीस पॉलिटीक्सची फोडणी भेटली मग तर काय?
आधीच मर्कट त्यात मद्य प्याला,
अशी लोकं आपल्याला उपद्र्व द्यायला लागतात,
आपल्याला मदत करण्यासाठी असलेली लोकंच कशी आपल्याला सळो की पळो करुन सोडतात,
हे मी खुप जवळुन बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि त्यातल्या काही लोकांना यशस्वीपणे हाताळलेलं आहे.
खरं तर उद्ध्ट, उर्मट आणि आपल्याच दयेवर जगुन आपल्यालाच न जुमानणार्‍या लोकांना आपल्यापासुन चार हात दुर ठेवलं पाहीजे,
बेभरवशाची आणि दगाबाज माणसं कितीही टॅंलंटेड असली तरी मनःशांती हिरावुन घेतात, ज्या लोकांमुळे आपण पुन्हा पुन्हा गोत्यात येतो, आणि तोंडावर आपटतो, अशा लोकांवर कधीही डिपेंड राहु नये, अशा माणसांना आपल्या आतल्या वर्तुळात कधीही प्रवेश देऊच नये,
पण तुम्ही सध्या ऑफीसमध्ये काम करत असल्यामुळे हा पर्याय तुम्हाला उपलब्ध नाही, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला टाळता येणे शक्य नाही, अशा वेळी इतर काय काय उपाय करता येतील, ते पाहुया!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१) मैत्री करा. –
दिवसभर सोबत राहुन एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा, आपल्या सहकार्‍यांशी हलकंफुलकं नात जोडणं हेच अधिक शहाणपणाचं लक्षण आहे.
जो जसा आहे, ज्याचा सहवास टाळता येण्यासारखा नाही, त्याला मनाने स्वीकारलं की आपोआपच मनावरचा ताण हलका होतो.
‘हा असाच वागणार’ हे आधीच गृहित धरल्यामुळे आता त्याने केलेल्या काड्यांमुळे मनःशांती भंग होत नाही.
अशा लोकांना वश करण्यासाठी अधुन मधुन त्याला थोडं चढवलं पाहिजे, थोडी त्याची तारीफ केली पाहीजे.
त्याच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहीजे.
त्याला काहीतरी भेट द्या, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करा, काही करुन त्याला बोलतं करा, जमल्यास त्याच्या घरी जा,
दमदाटी करुन संबंध बिघडवण्यापेक्षा प्रेम करुन जिंकणं, कधीही चांगलचं!
त्याच्याबद्द्ल आपलं जुनं मत बदलत आहे, ही जाणीव त्याला व्हायला हवी, म्हणजे आपोआपच त्याचे उपद्रव कमी होतील.
--------------------------------------------------------------------------------------------------------
२. अनप्रेडीक्टेबल बना. –
पण सर, काही काही लोकांना प्रेमाची भाषा कळतच नाही, बोट दिलं की डोक्यावर बसतात, खलबत्ता काढुन मिरे वाटतात,
अशा वेळी त्याला धक्काशास्त्राचा वापर करा.
रोज छान बोलायचं आणि एके दिवशी उगीच फटकुन वागायचं,
त्याच्या मनात आपल्याविषयी जरब बसेल अशी कोणतीही कृती करा.
त्या व्यक्तीचा संपुर्ण अभ्यास करा, त्याच्या स्ट्रेन्ग्थ, त्याच्या विकनेस ह्याविषयी संपुर्ण माहिती गोळा करा.
प्रत्येक माणसात काहीनाकाही दोष असतोच.
तो कधी चुकला की तात्काळ त्याची चुक त्याला लक्षात आणुन द्या,
त्याला सांगा, ही चुक लहान नाही, पण जाऊ दे, पुढच्या वेळी असे करु नको,
त्याला दाखवुन द्या, की तुम्ही किती मोठ्या मनाने त्याचे अपराध पोटात घालत आहात.
कोणीही माणुस आपल्याला तेव्हाच गृहित धरु लागतो, जेव्हा तो आपली सगळी पोथी ओळखुन घेतो,
‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ हे तत्व कुठेही कामाला येते.
समोरचा माणुस बघुन व्यवहार ठरवा.
मतलबी आणि चलाख लोकांशी संपर्क आल्यास, तुमचं खरं रुप, तुमचे कच्चे दुवे कोणालाच कळता कामा नये. नाहीतर तुमचा खेळ खल्लास!
कधी उगीचच त्याच्याशी मैत्रीपुर्ण संवाद करा, कधी उगीचच चेहर्‍यावर कठोर भाव ठेवुन त्याला गोंधळात पाडा.
--------------------------------------------------------------------------------------------------------
३. माणसं वाचा. त्यांची दुखरी नस शोधा. –
व्यवहारात यशस्वी व्हायचं असेल तर काही क्षणात माणसं वाचता आली पाहीजेत.
नेमकं काय बोललं म्हणजे एखादा माणुस आपल्याशी मैत्रीपुर्वक आणि सौहार्दाने वागु लागेल, हे गणित ज्याला जमलं तो खरा व्यवहार कुशल!
बॉसला जिंकण्यासाठी आपल्याला नेमुन दिलेलं काम चोख पार पाडा.
एक्स्ट्रा एफर्टस घ्यावे लागले तरी चालतील पण प्रत्येक वेळी दिलेल्या जबाबदारीपेक्षा काकणभर सरस कामगिरी करा.
जेव्हा तो आपल्यावर खुश असेल, जेव्हा आपलं नौकरीतलं स्थान भक्कम असेल तेव्हा, जवळीक साधण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न करा.
बॉसच्या मागे भक्कम पणे उभे रहा, छोट्या छोट्या घटनांमध्ये त्याला तुमचा आधार वाटला पाहिजे.
त्याने न सांगताही, काही कामं करा.
स्तुती हे एक असं आयुध आहे, जे एकही रुपया खर्च न करता माणसांना आपल्या बाजुने वळवण्यात यशस्वी ठरतं.
कधी डायरेक्ट कधी इनडायरेक्ट, पण नेहमी, ज्यांना ज्यांना आपल्या बाजुने वळवायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीची तोंड भरुन प्रामाणिक स्तुती करा.
ऑफीसमध्ये किंवा ऑफीसबाहेर ज्यांचा बॉसशी मैत्रीपुर्ण व्यवहार आहे, अशा लोकांसोबत एकदम बोलुन गेल्यासारखं, अगदी सहज म्हणुन छोट्यामोठ्या कारणासाठी बॉसची तारीफ करा,
तुमची तारीफ, तुमच्या भावना बॉसपर्यंत पोहचवतील अशीच माणसं निवडा.
बॉसवर कधीही उघड टिका करु नका, मिटींगमध्ये अप्रिय विषय टाळा.
फेसबुक, आणि व्हॉटसएप स्टेटस ला आवर्जुन कौतुक करा.
बॉसचे आपण निष्ठावान आहोत, असे चित्र उभे करा.
जेव्हा केव्हा बॉससोबत चहापाणी, नाष्टा, जेवण किंवा प्रवास करण्याची संधी मिळेल, त्यातली एकही संधी सोडु नका. साखरपेरणी करत रहा.
-----------------------------------------------------------------------------
४. इर्रेप्लेसेबल बना. –
तुमच्या कंपनीतील, तुमच्या ऑफीसमधील सर्वात महत्वाची व्यक्ती बनण्याची तुमची क्षमता आहे का?
इतका गजब परफॉर्मन्स द्या, की तुमच्याशिवाय कंपनी चालणे अशक्य होवुन बसावे.
तुम्हाला हर्ट करणे, किंवा तुमचा ऑफीस सोडुन जायचा विचार कोणालाही परवडु नये, असे एक स्वतःचे एक भक्कम स्थान तयार करा.
------------------------------------------------------------------------------------------------
४. अधुन मधुन शॉक थेरपीही वापरा. -
एकदा वर भक्कम स्थान निर्माण झालं की मग हाताखालच्या माणसाची कामात हलगर्जीपणा केल्याबद्द्ल जाहीर कानउघडणी करा.
त्याच्या मनात तुमची जरब आणि दरारा असेल तरच तो तुम्हाला भाव देईल.
‘माणुस मनाने खुप चांगला आहे, फक्त शिस्तप्रिय आहे’, असे त्याने चारचौघात आपल्याबद्द्ल बोलले पाहीजे,
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या जगात काम करणार्‍यापेक्षा काम करवुन घेणारा अधिक वेगाने श्रीमंत होतो आहे,
मॅनेजमेंट स्किल्सशिवाय कोणीही प्रचंड प्रगती करु शकणार नाही, हेच सत्य आहे.
इतरांकडुन काम करवुन घेण्यासाठी कधी प्रोत्साहन कामी येतं,
कधी एवॉर्डस आणि शाबासकी द्यावी लागते,
कधी शिस्तीचा चाबुक काढावा लागतो,
आणि कधी समोरच्या व्यक्तीचं हित कशात आहे, हे त्याला पटवुन द्यावं लागतं,
आवश्यक तिथे आवश्यक ते बोलायचं, आणि आवश्यक तिथे आवश्यक ते वागायचं, ह्यालाच मॅनेजमेंट म्हणतात.
आपल्या सर्वांना ही बिना एमबीए करता ह्या मॅनेजमेंट स्किल्स अवगत होवो, ह्या मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!
[9/26/2020, 11:50 AM] +91 95036 45430: -------------------------------------------------------------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – कालजयी कुमारगंधर्व!!
------------------------------------------------------------------------------------------------------------
एप्रिल १९४७!
पंडीत कुमार गंधर्व तेव्हा फक्त तेवीस वर्षांचे होते, पण दैवी सुरांचं वरदान लाभलेला अदभुत प्रतिभाशाली गायक म्हणुन त्यांची संपुर्ण भारतात ख्याती पसरली होती.
अवघ्या अकराव्या वर्षीपासुन कुमारगंधर्वांचा झंझावात सुरु झाला होता, तो मागच्या बारा वर्षांपासुन अव्याहत सुरुच होता,
कानपुर पासुन कर्नाटकापर्यंत आणि कलकत्यापासुन मुंबईपर्यंत, संपुर्ण भारतातल्या शास्त्रीय संगीतातल्या रसिकांना कुमार गंधर्वांनी आपल्या मोहक स्वरांनी भुरळ घातली होती.
आत्ता तर त्यांनी कुमार वय सोडुन यौवनात प्रवेश केला होता, अजुन तर किती लांबचा पल्ला गाठायचा होता,
पण एक अघटित घटना घडली, कुमार गंधर्वांना श्वास घ्यायला त्रास होवु लागला.
तपासण्या झाल्या, निदान झाले, डॉक्टर म्हणाले, तुम्हाला दमा आहे.
त्याकाळात दम्यावर प्रभावी उपचार नव्हते,
दैवी सुरांचं वरदान लाभलेले गंधर्व, इतक्या लहान वयात हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन तासनतास खिळवुन ठेवणारे कुमारजी,
लोकांना आपली सगळी दुःखे, चिंता विसरायला लावुन, फक्त आपल्या सुरांच्या बळावर लोकांना एक आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जाणारे कुमारजी,
देवधर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाले, कित्येक वर्षांच्या अखंड परिश्रमांमुळे शास्त्रीय संगीतातली रागांचे अदभुत बारकावे शिकलेले कुमारजी,
आता दिवसेंदिवस त्यांचा आवाज क्षीण होत होता,
गाणे तर सोडाच, नुसते बोलताही यायचे नाही,
दम्याने फुप्फुसे अशी काही पोखरुन टाकली होती की स्वरयंत्रातुन आवाज येणे जवळजवळ बंद झाले होते,
पुढची पाच वर्ष पंडीतजींनी एकही गाणं गायलं नाही,
गाणं, रागदरबारी, संगीत हाच कुमार गंधर्व ह्यांचा श्वास होता, आणि अजाण वयात भरभरुन दान पदरात टाकुन क्रुर नियतीने अचानकपणे आता ते सगळंच एका झटक्यात त्यांच्यापासुन हिरावुन घेतलं होतं,
संपत्तीच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला एका फटक्यात भिकारी बनवलं गेलं तर त्याला कसं वाटेल?
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम असणाऱ्या एका सच्च्या कलावंतासाठी, आपल्या कलेपासुन दुरावणे ही जीवनातली सर्वात मोठी वेदनादायी वेळ असते,
समजा, एखाद्या हाडाच्या चित्रकाराकडून त्याचा कॅनव्हास आणि कुंचलाच काढुन घेतला तर तो कसा पाण्यातुन बाहेर काढलेल्या माशासारखा तळमळत बसेल? तसंच काहीसं!...
किंवा टेनिस एल्बोमुळे सचिनला क्रिकेटपासुन काही वर्ष दुर रहावं लागलं होतं तेव्हा त्याला काय वाटलं असेल, तसं काहीसं!...
अशा विपत्तीला संवेदनशील व्यक्ती सहन करु शकत नाही, इतिहासात अनेक कलावंतांची दुःखद अखेर अशीच पहायला मिळते,
कुमार गंधर्व यांचं एक फुफ्पुस पुर्णपणे निकामी झालं, पण तरीही कुमारजी खचले नाहीत,
ते तानपुरा घेऊन रियाजाला बसायचे, आणि इतरांना आलाप घ्यायला सांगायचे,
ते मनातल्या मनात गायचे,
तासनतास गायचे,
गळ्यातुन नाही गाता आलं तर काय झालं? अगदी ह्रद्यातुन गायचे,
लोकांना ऐकता नाही आलं तर काय झालं, स्वतःसाठी गायचे,
गाता गाता त्यांची भावसमाधी लागायची, आणि डोळ्यातुन पाणी वाहु लागायचं,
त्यांची संगीतावरची, गायनावरची ही भक्ती पाहुन अखेर नियतीलाही पाझर फुटला,
१९५० च्या सुमारास दम्यावर प्रभावी अशा एका उपचारपद्धतीचा शोध लागला.
ह्या काळात कुमारजींच्या पत्नी भानुमती ह्यांनी दिवसरात्र त्यांची मनोभावे सेवासुश्रुषा केली, त्यांना आधार दिला,
आणि कुमारजींचा आवाज परत आला,
आता त्या आवाजात आधीसारखे तळपणारे तेज नव्हते, पण तो कठिण संकटातुन तावुन सुलाखुन बाहेर पडुन अजुनच आकर्षक आणि मोहक झाला होता,
फक्त एका फुफ्पुसाने श्वास घेत कुमारजी पुढची अडतीस वर्ष लाखो श्रोत्यांचे कान तृप्त करत राहीले.
परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या भारतीय शास्त्रीय संगीताला कुमार गंधर्व ह्यांनी नवे वळण दिले.
अगदी तरुणपणीच मृत्युच्या दारात जाऊन आल्यामुळे की काय, त्यांच्यात एक पवित्रता, शुद्धता आली होती,
साक्षात मृत्युला भेदुन गेल्यानंतर शिल्लक असलेल्या फक्त आणि फक्त असीम आनंदाला त्यांनी अनुभवले होते का?
त्याच आनंदाला त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये. सुरांमध्ये नितळपणे उतरवले होते का?
म्हणुनच प्रत्येक वेळा त्यांची गाणी आपल्याला भावसमाधीत घेऊन जातात का?
“‘सुनता है गुरु ग्यानी’, गगनमे आवाज हो रही झीनी झीनी!...”
पवित्रता फक्त त्यांच्या आवाजातच नव्हती, तर त्यांच्या आचरणात आणि विचारांमध्येही होती.
योगायोगाने कुमारजींचा पुर्नजन्म झाला, आणि त्यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर एका नव्या आणि अदभुत, विस्मयकारी प्रकारच्या शास्त्रीय संगीताचे सर्जन केले.
आपल्या निर्गुणी भजनांमध्ये कधी त्यांनी कबीराचे दोहे मनमुक्तपणे गायले,
कधी माळवा-गुजरात प्रांतामध्ये प्रसिद्ध लोकगीते त्यांनी रागदरबारीमध्ये गुंफली, आणि भारतीय संगीताची अनोखी झलक जगापुढे सादर केली.
कुमार गंधर्वांनी अनेक भजने गायली, तशीच काही मराठी गाणीही गायली,
असंच एक गाणं जे कितीही वेळा ऐकलं तरी कान तृप्त होत नाहीत ते म्हणजे, “ऋणानुबंधाच्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी!”
हे गाणं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम ह्यांनी गायलेलं एक अप्रतिम गीत आहे.
अगदी कालपरवा पुलंच्या जीवनावर आलेल्या भाई – व्यक्ती आणि वल्ली ह्या चित्रपटमध्येही त्याची झलक आली होती,
पंडीतजींच्या आवाजांशी माझं एक नातं आहे,
आयुष्यात जेव्हा केव्हा संघर्षाचे प्रसंग आले, तेव्हा पंडीतजींच्या पवित्र सुरांमध्ये मी स्वतःला झोकुन देतो,
आणि काही क्षणांमध्ये सगळ्या चिंता, दुःखे कापरासारखी उडुन जाते,
कुमार गंधर्वांच्या शब्दात इतकी शक्ती आहे की त्यांच्या सुरावटी ऐकल्यानंतर नुसता मुड फ्रेश होत नाही,
एका दिव्य आनंदाची अनुभुती होवु लागते, आतमध्ये आनंदाचे झरे फुटु लागतात.
कुमार गंधर्व हे भारतीय शास्त्रीय संगीतसृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्नं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
संगीत हे मुड बदलवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे,
आयुष्यात माझ्यावर अनेकदा हादरावुन टाकणारी संकटे आली,
जेव्हा जेव्हा मी सैरभैर झालो
पण भीमसेन जोशी, पंडीत जितेंद्र अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, गायत्री-रागिनी, ह्या सर्वांच्या दैवी सुरांनी मला प्रत्येक वेळी निराशेतुन बाहेर काढलं,
सैरभैर झालेल्या मनाला, पुन्हा एकदा उत्साहित केलं,
आनंदी होण्याचं एकही कारण जवळ नसताना, सुर हेच माझ्यासाठी आनंद-धाम बनले,
नरकयातनांचे मोक्षामध्ये रुपांतर करण्याची शक्ति अभंगामध्ये आहे, भजनांमध्ये आहे, सुरांमध्ये आहे, हे मी कित्येकदा अनुभवले आहे.
आणि असंचं, चलबिचल झालेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा हुकुमी उपाय म्हणजे,
कुमार गंधर्वांना ऐकणे,
स्वतःला त्यांच्या स्वाधीन करणे,
काही कळो किंवा न कळो, त्यांच्या गाण्यामध्ये स्वतःला झोकुन देणे,
आपोआपच आपला प्रत्येक रोमरोम दिव्य चैतन्याने काठोकाठ भरुन जातो,
आजही जेव्हा केव्हा रात्र रात्रभर ड्रॉईंग पुर्ण करण्यासाठी मला जागावे लागते,
 तेव्हा साथीला पंडीतजीच्या दैवी सुर असले की काम करण्याचा शीण क्षणात नाहीसा होतो,
दिवसभर कितीही थकलेलो असलो तरी असामान्य उर्जा मिळते,
शब्दात सांगता येत नाही, असा आनंद मिळतो,
रात्र कधी संपली तेच कळत नाही.
आणि हीच पंडीत कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजाची जादु आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
शुभेच्छा आणि आभार!!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...