Friday, July 1, 2022

-- नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे!--

नातं कोणतंही असो

मतभेद कितीही असो

संबध तोडण्याची भाषा 

मुळीच कधी करू नये


प्रत्येक माणूस वेगळा

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी

कहाणीच आगळी-वेगळी


बापा सारखा मुलगा नसतो 

मुली सारखी सून नसते

नवरा आणि बायकोचे तरी

कुठे तेवढे पटत असते?


जरी नाही पटले तरी

गाडी मात्र हाकायची असते

अबोला धरून विभक्त होऊन

सारं गणित चुकायचे नसते


काही धरायचं असतं

काही सोडायचं असतं

एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून

एकमेकाला सोडायचं नसतं


चुकल्यावर बोलावं

बोलल्यावर ऐकून घ्यावं

एकांतात बसल्यावर

अंतरंगात डोकवावं


राग मनात ठेवला म्हणून

कोणाचं भलं झालं का?

बिन फुलाच्या झाडा जवळ

पाखरूं कधी आलं का?


समोरची व्यक्ती चुकली तरी

प्रेम करता आलं पाहिजे

झालं गेलं विसरून जाऊन

गच्च मिठी मारली पाहिजे


स्वागत होईल न होईल

जाणं येणं चालू ठेवल पाहिजे

समोरचा जरी चुकला तरी

म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला!"


आयुष्य खूप छोटं आहे 

हां हां म्हणता संपुन जाईल

प्रेम करायचं राहिलं म्हणून

शेवटी खूप पश्चात्ताप होईल


लक्षात ठेवा नात्या पेक्षा

दुसरं काहीही मोठं नाही

आपलं माणूस आपल्या जवळ  

या सारखी श्रीमंती नाही!

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...