Thursday, June 30, 2022

वास्तुशांती

 🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (२)

            वास्तुशांती म्हणजे केवळ "वास्तुपुरुषाची शांती" असा अर्थ नसून  "वास्तुस्थानावरील शांती" असाही अर्थ अभिप्रेत आहे. ही वास्तुशांती केल्याखेरीज घरात प्रवेश करू नये, असा कोणत्याही शास्त्रग्रंथात दुराग्रह नाही. वास्तुशांतीला किमान अपेक्षा म्हणजे त्या घराची दारे, खिडक्या बसविलेल्या असाव्यात. अर्धवट घराची वास्तुशांती करू नये. रंगकाम व आतील सजावट, कट्टे नंतर केले तरी चालतील. घर बांधून झाल्यावर एखाद्या शुभदिनी घराच्या मुख्य भिंतीवर कुंकवाचे पट्टे ओढून घरास आम्रपल्लवादिकांनी सजवून प्रथम पत्रावळीवर तांदुळपुंज करून त्यावर भरलेला कलश ठेवून त्यात चंदनगंध, हळदीकुंकू, फूल, उदकाडी, नीरांजन व नैवेद्य यांनी पंचोपचार पूजा करावी व नमस्कार करावा. नंतर यथावकाश घरातील साहित्य नेऊन रहावयास जावे. नंतर पंचांगातील वास्तुशांती व गृहप्रवेशाचे मुहूर्त पाहून, घरातील काही अडचणी नाहीत असे पाहून आपल्या आर्थिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे वास्तुशांती करावी.

           घर मोठे असल्यास वास्तुपुरुषास अधिकाधिक आहुत्या द्याव्यात. वास्तुनिक्षेप (वास्तुप्रतिमा जमिनीत ठेवणे) नेहमी आग्नेय दिशेस करावा. त्यावर केरकचरा पडू नये. नेहमी पूजेच्या वेळी वास्तुपुरुषास नमस्कार करण्याची प्रथा ठेवावी. वर्षातून जमेल तेव्हा पंचोपचार, षोडशोपचार पूजा करावी. वास्तुशांती झाल्यावर लगेच त्याच दिवशी ते घर बंद ठेवू नये. काही दिवस तेथे वावर ठेवावा. दर दहा वर्षांनी वास्तुपूजा होणे आवश्यक आहे. त्यावेळी वास्तुनिक्षेप वगळून इतर सर्व विधी करावेत. ज्याला खऱ्या अर्थाने वास्तुशांतीचे फळ व फायदे हवे असतील, त्यांनी किमान एक ग्रॅमची व जास्तीत जास्त कितीही वजनाची सोन्याची पूर्णाकृती वास्तुप्रतिमा काही दिवस अगोदर आणून तिचे किमान १२/१२ सूक्तांनी आग्युत्तारण करून प्राणप्रतिष्ठा करावी.

           दररोज पंचामृत पूजा व "वास्तोष्पते" ह्या सूक्ताचा अभिषेक करावा. जितका अभिषेक जास्त होईल, तितकी वास्तुदेवता अधिकाधिक जागृत व प्रगल्भ होऊन, त्या घरात अधिकाधिक सुखशांती, समाधान लाभते. वास्तुशांतीच्या आसपास उदकशांती करून घेणेही तितकेच आवश्यक असते. घरात सोयर, सूतक, रजस्वला यांचे विविध विटाळ झाल्यामुळे पाणी व अन्न यावर कुसंस्कार होतात. यासाठी उदकशांतीही करावी. वास्तविक वास्तुशांती जशी दहा वर्षातून एकदा तरी, तशी उदकशांतीही प्रत्येक वर्षी किमान एकदा करावी, असा शास्त्रसंकेत आहे.

           वास्तुशांतीच्या दिवशीच पाहुणचार मोठ्या प्रमाणात केल्यास यजमानाचे लक्ष पाहुण्यात व आहेरात गुंतल्यामुळे एकाग्रता भग्न पावून वास्तुशांतीचा विधी समाधानकारकरित्या होऊ शकत नाही. यासाठी आदल्या दिवशी वास्तुशांती व इच्छा असल्यास दुसऱ्या दिवशी किंवा नंतर सवडीने सत्यनारायणासारखी एखादी महापूजा आयोजित करून मोठ्याप्रमाणात भोजन समारंभ आयोजित करण्यास हरकत नाही. (पूर्ण)

संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...