Sunday, June 26, 2022

सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी


सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी, सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.

मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे रामनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो.
 
मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास आपण सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का? थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे. 

जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...