Monday, January 9, 2023

बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी -

 बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी -


मंडल आयोग, रथयात्रा, बाबरी पतन, 92-93 च्या मुंबई दंगली, नामांतर आंदोलन या जागतिकीकरण स्वीकारायच्या आधीच्या आणि नंतरच्या एकूण 5-6 वर्षातल्या काळात घडलेल्या आंदोलनात आणि दंगलीत महाराष्ट्रातील लाखो मराठा, महार, मुसलमान, OBC तरुणांची दंगलखोर म्हणून पोलीस दफ्तरी गुन्हेगारी नोंद झाली आणि नव्याने स्वीकारलेल्या जागतिकीकरणात पटापट नोकऱ्या निर्माण होत असताना या लाखो तरुणांना हातात डिग्री असूनसुद्धा बेरोजगार राहावे लागले. 

याच काळात पुण्या-मुंबईतून कॉम्प्युटरची डिग्री सोडा, अवघे काही महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स केलेले प्रामुख्याने ब्राम्हण समाजातील तरुण या सर्व कोलाहलात सहभागी न होता अमेरिकेत, युरोपात नोकऱ्या करायला अक्षरशः झुंडीने जायला लागले. पुण्यात पेठेत 10 बाय 10 च्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबांनी पुढे याच पोरांनी अमेरिकेतून कष्ट करून पाठवलेल्या पैशातून प्रभात रोड, कोथरुड, एरंडवणे भागात चांगली घरे आणि गाड्या घेतल्या. जागतिकीकरणाचा खरा फायदा या तरुणांनी करून घेतला.

आज जेव्हा अमेरिकेचे नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड घेतलेली ही 90-92 सालची तरुणाई (आजची पन्नाशी ओलांडलेली पिढी) जेव्हा भारतात सुट्टीसाठी काही दिवस येते तेव्हा त्यांना रिक्षा किंवा ओला-उबर मध्ये फिरवायला, त्यांची व्यवस्था बघायला त्यांच्याच पिढीतील दंगली-आंदोलनात वाया गेलेली बहुजनांची पिढी लाचारपणे हजर असते. आजही आपल्याकडे पानटपऱ्या चालवणारे पन्नाशीतले बहुजन लोक आशिकी, फुल और कांटे ही त्यांच्या उमेदीच्या काळातली गाणी ऐकत बसतात, त्या पोरींच्या आठवणीत ज्या ह्यांच्या बेरोजगारीमुळे दुसरीकडे लग्न करून गेल्या.

आपल्या पोराने जर आयुष्यभर रिक्षा/टॅक्सी चालवू नये, विना अनुदानित शाळेत मास्तरकी करू नये, हमाली करू नये, कर्जबाजारी होवून शेतात फास घेवू नये, उतारवयात कुणापुढे लाचारीने हात पसरू नये असे वाटत असेल ना.... तर सगळ्यात पहिल्यांदा चौकातल्या राजकीय पक्षाच्या आणि संघटनेच्या फ्लेक्सवर दिसणाऱ्या आपल्या पोराच्या एक मुस्काटात फोडा (पोलिसांनी ते करण्यापेक्षा आईबापाने करणे केव्हाही चांगले!) आणि त्याला अभ्यासाला लावा. कुठलाही मोदी, गांधी, पवार, फडणवीस, ठाकरे, भिडे, मुंडे, पाटील तुमच्या घरातील चूल रोज पेटवायला येणार नाहीये. तुमच्या पोरावर केसेस पडल्या तर कुणी जामीन करायला येणार नाहीये.

आजच्या काळात आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुमच्या पोरा-पोरींचे आदर्श गांधी, आंबेडकर, नेहरू यांसारखे विद्वान आणि विधायक मार्गाने सामाजिक बदल घडवून आणणारे नेते पाहिजेत. तिघेही आधी बॅरिस्टर होते आणि नंतर समाजाला शहाणपण शिकवायला गेले होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना वगैरे दलिंदर गोष्टीत, मोर्चात, बैठकीत, मोहिमेत आणि दंगलीत जर तुमचे अर्धशिक्षित कुलदीपक जात असतील आणि तुम्ही त्यांना थांबवत नसाल तर आईबाप म्हणून तुम्ही नालायक आहात आणि तुमच्या पोरांचे सगळ्यात मोठे वैरी आहात! थोडी अक्कल येवू द्या!!!

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...