Thursday, December 22, 2022

--“पाणी अडवा-पाणी जिरवा-जीवन आपले समृध्द बनवा”--

  सध्याच्या युगात वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण आणि वाढते नागरिकीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. भूगर्भातील अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे कमी होत आहेत. प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, "पाणी अडवा-पाणी जिरवा' धाेरणाचा अवलंब तसेच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करुन पाण्याच्या वापराबाबत साक्षरता निर्माण करण्याची गरज आहे.

     पाणी हा धरतीचा आत्मा आहे. पाणी हेच जीवन आहे व राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. धरतीवरील जीवसृष्टी फुलविण्यात पाणी महत्त्वाचे असल्याने त्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. मानवी आरोग्यावर पाणी आवश्यक आहे. स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याप्रमाणे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे व पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजनपूर्वक जतन करणे, हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. यासाठी "पर्यावरणप्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आपण पाणी बचतीसाठी अग्रेसर राहू या."
      नदी, नाले, झरे, तलाव विहिरी हे जे जीवसृष्टीला जगविणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांचे रक्षण करणे, देखभाल करणे, पावसाचे पाणी साठविणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, पाणी प्रदूषण न करणे, उपलब्ध पाणी व पावसाचा थेंब न थेंब काटकसरीने वापरणे, कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, वनराई बंधारे बांधकामातून पाणी साठवण, रेन वॉटर हार्वेस्टिंग (पाऊस पाणी संकलन), बागेसाठी व शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर,सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्यांची निर्मिती, बोअरवेल रिचार्ज करुन पाण्याचे पुनर्भरण करावे हे पाणी वाचविण्यासाठी करणे आवश्यक आहे.
      पाणी ही आपल्याला मिळालेली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. सजीवांच्या समृध्दीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. ते जपू या व प्रगती साधू या, भावी पीढीसाठी पाण्याच्या अनमोल साठ्यांचे जतन करण्यासाठी सांघिक प्रयत्न करु या व देशाची जलसंपत्ती समृध्द करु या. जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी आजपासून पाणीबचतीचा संकल्प करु या. प्रत्येकाने हे केल्यास आपली भारत भूमी अधिकाधिक सुजलाम सुफलाम होईल.

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी 
रायगड-अलिबाग
००००००

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...