_हक्काची व्यक्ती जेव्हा आपली असतात. तेव्हा मात्र आपला प्रत्येक क्षण आनंदाच्या कवेत जातो. कितीतरी उत्साह आपल्या जीवनासोबत भरत असतो . ना नफा ना तोटा या ओळीप्रमाणे आपण त्या व्यक्तीला आपला बहुमुल्य वेळ देत असतो. कारण हक्काची बाजू आपण कमजोर न करता ते परिपूर्ण नातं निभावल्याची साक्ष देत असते. कितीतरी आपुलकीने त्या नात्याला मनाच्या इंद्रधनूतून सप्तरंगाची उधळण करत असतो. काही नाती जितकी जपाल तितकी ऋणानुबंधाच्या उंबरठ्यात घट्ट रोवली जातात. एकदा जपलेलं नातं आयुष्यभर ज्याला निभावता आलं तोच खरा जीवनाला आकार देऊ शकतो. काही जण रोज एक नातं निर्माण करतात परंतु त्या नात्यामध्ये स्थिरता नसेल तर त्या नांत्यांची वैधताही लवकरच संपलेली असते. जितकं आपण निर्मळ दृष्टिकोन ठेवून नातं जोडत असतो तितकेच त्या नात्याची पवित्रता आणखी खुलत असते. कारण तिथे विश्वास ,प्रेम, ओढ, जिव्हाळा या सर्व बाबींचा सुंदर संगम पाहायला मिळत असतो. यालाच जीवन ऐसे नाव देता येईल._



No comments:
Post a Comment