Friday, August 19, 2022

 पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही.

ना पैसा, ना शेती, ना नौकरी, ना चाकरी...

टप्पा १:- १९५० ते १९७५

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. 
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक... 
मोठे वाडे...  
दांडगा रुबाब... 
निसर्गावर चालणारी शेती... 
अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. 
अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले. 
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती. हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता. 

टप्पा २ :- १९७५ ते १९९५ 

देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली. 
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले. 
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले. 
शेती आता भांडवलदाराची होऊ लागली. विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या. 
पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली. 
राजकारण गावागावात घुसलं, पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या, बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले. 
स्पर्धा वाढली, आता नोकरी सोपी राहिली नाही. 
हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला. 
वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली. 
२० एकराचा मालक मोकळा झाला. गावच्या कट्ट्यावर बसून विड्या फुंकू लागला, त्याची पोरं बेकार फिरू लागली. 

टप्पा ३ :- १९९५ -२००९ 

हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ. 
परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले. 
मोठे उद्योग यांनी काबीज केले, हॉटेल सिंधी, शेट्टी, राजस्थानी लोक, दूध-पेपर-भाजीपाला-टॅक्सी-पाणीपुरी-किरकोळ दुकानदारी उत्तरेतील लोकांनी काबीज केली. 
सहकारी कारखाने, बँका, पेट्रोलपंप, बिअरबार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली. 
मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडतो... 
बोअर मारतो... 
स्पर्धा परीक्षा तयारी... 
भरतीला जातो... 
पोराला हायस्कुल वर चिटकवतो... 
ह्यातच गुंतलेला दिसला. २० एकर जमीन वाटण्या होऊन, मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते. 
अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता. 

टप्पा ४ :- २००९ ते २०२०  

ग्लोबलायझेशन झाले, जगाचे पैसे भारतात आले. 
पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या. 
मग काय ? 
जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली. 
राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला. 
जमीनदारी संपली... 
पोरं बेकार... 
पुणे-मुंबईत ८ - १० हजारांच्या नोकऱ्या करू लागली. 
आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही. 
खरी, बिकट गरिबी सुरु झाली. 
पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला. 
गावचा जमीनदार हमाली करू लागला. 
व्यापार तृतीय म्हणायचे. त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर, मुनीमकी अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करण्यासाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.. 

टप्पा ५:- २०२० ते २०३०

इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल. ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार... 
नोकरी हा विषय संपला आहे !!!!
नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल. 
उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल. 
पैसा न कमविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही. 
शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.

म्हणून मराठी तरुणांना विनंती आहे अजून वेळ गेली नाही. शेती सांभाळा. शेती बरोबर जोडधंदे करा, नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.....

जो चूक करतो तो माणूस... 
तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... 
जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... 

           आता वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्या चूका पुन्हा होणार नाहीत हे पाहण्याची..

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...