मनातलं सांगायला
तू ये माझ्याकडे ,
मला आहे वेळ
तुझं सारं काही ऐकायला.
काही नवीन केलंस..?
दाखव ना मला:,
मला आहे वेळ
तुला शाबासकी द्यायला.
जायचंय कुठे तुला..?
सांग ना मला,
मी येईन तू म्हणशील तिथे
तुला सोबत करायला.
एकटं वाटतंय खूप..?
बोल ना माझ्याशी,
मला आहे वेळ
भरपूर गप्पा मारायला.
कधीही, केव्हाही
साद घाल मला,
मी आहे तयार
सदैव प्रतिसाद द्यायला.
बोलून टाक मनातलं,
व्यक्त कर सगळं,
एकटं नको समजू स्वतःला,
मी आहे ना साथ द्यायला.
तुझं नि माझं नातं काय..?
याचा विचार नको करू.
मनाचं नातं आहे मनाशी,
नाव माझं मैत्री..!

**********************************************************
जिंकायचे जगाला इतकाच ध्यास होता,
वाटेत जीवनाच्या,खडतर प्रवास होता!
करतोस का उगा रे, तू काळजी कुणाची,
इतुका सवाल माझ्या, हळव्या मनास होता!
पोटात भूक तेव्हा, दाटून यायची पण,
दुरडीत भाकरीचा, नुसता सुवास होता!
कुठलेच दुःख नाही, नाही व्यथा कशाची,
मग चेहरा तुझा का, इतका उदास होता!
शोधात मी सुखाच्या, आजन्म चालल्यावर,
नंतर कळून आले, चुकला प्रवास होता!
का द्यायचे अताही, निवडून सांग त्यांना,
कोऱ्याच कागदावर, ज्यांचा विकास होता!
नारी सशक्त आहे,सांगायचे जगाला,
पण आत उंबऱ्याच्या, दररोज त्रास होता!
वाटेत भेटल्यावर, ती हासली जराशी,
मग काल मारलेला, टोला कुणास होता!
बांधून ठेवणारा..... एकत्र माणसांना,
तो उंबरा शहाणा, माझ्या घरास होता!

धनाजी जाधव

No comments:
Post a Comment