काल पाउस माझ्याकडे वस्तीला आला होता
त्याच्या सोबतचा म्हणे ढग हरवला होता
विचारलं, "रस्ता चुकला की हात सुटला होता?"
म्हणाला, तो एका विजेच्या प्रेमात पडला होता
म्हणाला, अरे वीज पण तशी रूपवानच् होती
कुणीही रस्ता चुकावं, भुलावं अशी देखणीच् होती
म्हटलं, "नेमकं कशाचं तुला वाईट वाटतंय?
ढग दुरावल्याचं, की त्याला कोणी भेटल्याचं?
माझ्या खांद्यावर डोकं ठेउन तो खूपखूप रडला
रडून रडून कंटाळला, आणि घरातच झोपला
सकाळी जाताना म्हणाला, "ओळख ठेव, येतो
पण कुणाला सांगू नकोस मी वस्तीला होतो"
त्याचाही मित्र शेवटी माणसासारखाच् वागला
क्षणिक चकचकाट पाहून हात सोडून धावला
एकदा पाऊस माझ्याकडे रहायला आला.
भिजून आला म्हणून मी थोडा त्याला पुसला.
हसून म्हणाला,
' मी आतुनच ओला आहे ,
सुखदुःखाचा माझ्याकडे ठेला आहे .
नाही आलो, तरी लोक रडतात,
जादा आलो तरी लोक रडतात.
मला त्यांची समाधान रेषा शोधायची आहे '"
खिडकीजवळ बसला, स्वयंपाकघरात आला,
बेडरुमध्येही डोकावून गेला.
जाताना थोडा हेलावला.
मिठी मारून कानात म्हणाला,
"काही झालं तरी, हृदयाच्या कप्प्यात
ठेव थोडी जागा माझ्यासाठी..
आणि थोडा ओलावाही.
कधी कधी मला त्याचीही गरज भासते..."
जाताना थोडं पाणी माझ्या डोळ्यात ठेवून गेला..
एकदा पाऊस माझ्याकडे रहायला आला.
असाच एकदा पाऊस माझ्या घरात आला
चक्क हाताला धरून मला, बाहेर घेऊन गेला
म्हंटलं अरे , हळू बाहेर ओलं आहे फार,
तर हलकेच त्याच्या हातांचा गळ्यातच पडला हार
त्याचं' असं येणं' खरंतर आवडलं होतं मनाला
खूप प्रतीक्षा केली त्याची अगदी प्रत्येक क्षणाला
वाटलं होतं आधी कळवेल , थोडी कल्पना देईल
माझ्याकडून स्वतःचं स्वागत, हक्काने करून घेईल
वाफाळती कॉफी नि गरमागरम भजी
खिडकीत बसून गप्पा मारत केली असती मजा
थोडीशी धांदल झाली तो अवचित आल्याने,
'सावरायचं कसं, ' कळलंच नाही, गळाभेट दिल्याने
दोघंही मग खूप भिजलो आठवांच्या पावसात
हाती हात धरून गेलो थेट माहेरच्या परसात
लहान झालो दोघंही कागदाच्या नावा केल्या
एकमेकांशी स्पर्धा करत हिरिरीने सोडून दिल्या
जाऊन आलो शाळेतही बाकावर पाहिलं बसून
फळ्यानही बघितलं मला ओळखीचं हसून
कुणास ठाऊक सगळ्यात किती गेला वेळ ?
मन खेळत होतं आठवणींशी पाठशिवणीचा खेळ
अचानक चमकली वीज आणि दोघे आलो भानावर
निरोप देताना एकमेकां मन झालं अनावर
निघताना मी त्याला म्हटलं, तुला भेटून बरं वाटलं
नकळत एक आभाळ माझ्या डोळ्यांत दाटलं
No comments:
Post a Comment