मद्यपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवल्या व्यभिचारीणी । दैन्यवाणी पतिव्रता ।।१६।।
केवढी दोषांची सबळता । झाली पहा हो भगवंता । पुण्य धुडावोनि संता । तीर्थां हरी आणिली ।।१७।।
भेणें मंद झाली मेघवृष्टी । आकांतली कांपे सृष्टी । देव रिघाले कपाटी । आटाआटी प्रवर्तली ।।१८।।
अपीकें धान्ये दिवसेंदिवसें । गाई म्हैसी चेवल्या रसे । नगरें दिसती उदासे । पिकले बहुवसे पाखांडे ।।१९।।
होम हरपली हवने । यज्ञयाग अनुष्ठानें । जपतपादिं साधने । आचरणें भ्रष्टली ।।२०।।
अर्थ -
कलियुगात दारू पिणे हेच सभ्यपणाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे आणि जे अत्यंत उत्कृष्ट असे दुधापासून तयार केलेले लोणी, दही, तूप असते त्याला कुणीही विचारत नाही. ।।१६।।
देवा ! ह्या कलियुगात पापाला किती बळ चढले आहे बघ. पुण्याचा नाश होऊन साधू संतांचा पराभव होत असल्याचे दिसत आहे. ।।१७।।
पापाच्या भयामुळे आता पाऊस सुद्धा पडेनासा झाला आहे. आकांतामुळे सृष्टीलाही कापरे भरू लागले आहे. देवता दऱ्याखोऱ्यात लपून बसल्या आहेत. अशी ही सगळी आटाआटी झाली आहे. ।।१८।।
दिवसेंदिवस आता जमीनी नापीक होत चालल्या आहेत. गाई आणि म्हशी जास्त दूध देईनाशा होत आहेत. शहरे भकास होत चालली आहेत. सगळीकडे पाखांडाचे पीक येत चालले आहे. ।।१९।।
होम हवन ही साधने आता संपल्यात जमा झाली आहेत. यज्ञयाग व अनुष्ठाने तसेच जपतपादि साधनेही आता आचरण भ्रष्टतेमुळे लोप पावत चालली आहेत. ।।२०।।
+++++++
#
No comments:
Post a Comment